Wednesday, December 23, 2009

हल्ली

हल्ली खुळ्यागत पुटपुटतंच असतो मी काही
ते सारं मलाही कळतंच असं काही नाही
कविता, गाणी, गझला, कधी श्लोकही
हे सारं वेड्यासारखं काय चाललंय, असं म्हणतेही आई


ज्या दिवसापासून ती मला सोडून गेली
अजून तशीच जपली आहे मी माझी खोली
तिची पत्रं, तिचे फोटो, भेटवस्तू, माझ्या कविता
पहिल्या भेटीतला रुमाल, जाताना विसरलेली ओढणी


तश्याच जपल्या आहेत खुणा, मी कवितेच्या पुस्तकातल्या
ते दिवसही तिथंच थांबलेले, त्या कविताही तिथंच थांबलेल्या
अर्ध्या झोपेत अडलीच एखादी ओळ, तर स्वप्नात अडतोच श्वास
म्हणून उशाशी बाळगतोच मी सारे कवितासंग्रह


हल्ली कितीही जपलं तरी उसवतंच जाते मनाची शिवण
खिळखिळे होतात धागे अन् निखळतातच पाने कवितेची
हल्ली निघतातच खपल्या जुन्या जखमांच्या
आणि जीवनाच्या पानावर सांडतेच शाई


कवितांची वही उघडली की फुटतातच सारे बांध
भिजते कवितांची वही अन् भरतेच खोली अश्रूंनी
भिजत पडल्या प्रश्नांप्रमाणे तरंगत राहते सारे, मी माझी उदासीही
पण फक्त धुतली जाते शाई, कागद होतात कोरे, पण राहतातच ओले


असा गाव वाहून जायला यावेच लागतात अश्रूंचे पूर
असे भिजले मन वाळायला द्यावेच लागते विचारांचे ऊन

- वीरेंद्र देशपांडे २३/१२/२००९

Sunday, December 6, 2009

आता वाटतं...

आता वाटतं सुटावेत अलगद नकळत हात
जशी सहजच सुटे सुरगाठ, पण आहे ती निरगाठ

कसा विसरणार तिचा स्पर्श, तिचा गंध, पहिली मिठी
पावसात चिंब भिजलेली अन्‌ थरथर माझ्या ओठी

हसता हसता कधी आठवेलंच ना तिचा हसरा चेहरा
रडता रडता आठवेलंच ना अश्रूंनी भिजलेला खांदा

प्रत्येक क्षण तिच्याच नावावर, प्रत्येक श्वासात तिचाच उष्ण श्वास
हे क्षण परत कसे फेडू? हे श्वास परत कसे सोडू?

नाळ जेव्हा तुटते, नाते जेव्हा मिटते, तेव्हा काय वाटते?
मायेची अंथरलेली चादर फाटते

एका क्षणापूर्वी आपलं सर्वस्व असलेलं कुणी
दुसर्‍या क्षणी आपलं कुणीच उरत नाही

-वीरेंद्र देशपांडे ०६/१२/२००९

अजूनही!

मला सोडताना तू दिलेली लाली तशीच माझ्या ओठी
अजूनही तुझ्याच मिठीची ऊब झगडतेय या थंडी पावसाशी

तू दिलेल्या मोगर्‍‍याच्या कळ्या ओंजळीत ठेऊन मी भिजतोय
तुझीच ओढणी लपेटून मी अजूनही तिथंच बसलोय

अजूनही माझ्या श्वासाश्वासात तुझाच उष्ण श्वास
रंध्रारंध्रातून तुझीच आस, पावलोपावली तुझाच भास

माझा रस्ताच थांबलाय त्या वळणावर, अन बुध्दी थिजलिये
ठोकाच चुकलाय त्या समेवर, पण अजूनही मन वेडं गातंय तुझीच गाणी

आता मला माझं नाव आठवत नाही, मला माझं गाव आठवत नाही
पण अजूनही आठवते आहेस ती, फक्त तू! ... फक्त तूच!

- वीरेंद्र देशपांडे ०६/१२/२००९

त्रिकाल

प्रेम झालाय भूतकाळ
लग्न आहे भविष्य
ही चारोळी हे वर्तमान
प्रेयसीची आस मात्र आहे त्रिकाल

- वीरेंद्र देशपांडे ०५/१२/२००९